--- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
: गणेशोत्सव हा हिंदूंचा सण आहे. तो जर भारतात नाही तर मग काय पाकिस्तानात साजरा करणार का असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. गणेशोत्सव दणक्यात साजरा व्हायला हवा असंही ते म्हणाले आहे. तसंच नालेसफाईवरुन काल टीका करणार्या भाजपचाही उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. मुंबईच्या नालेसफाईवरुन चिंता व्यक्त करणार्यांनी तुंबलेल्या दिल्लीकडे लक्ष द्यावे, तिथे सत्ता कोणाची आहे असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे.
रविवारी गणेशोत्सव समिती व महापालिकेच्या बैठकीत उद्धव ठाकरे उपस्थित होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी गणेशोत्सव उत्साहातच साजरा होणार असल्याचं म्हटलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी गणेशोत्सवासंदर्भात विरोध करणार्यांवर जोरदार टीका केली.
उत्सव हा उत्सवासारखाच साजरा झाला पाहिजे. रस्त्यावर बसून नमाज पढणार्यांविरोधात कोणीही कोर्टात गेले नाही, पण आपल्या उत्सवांविरोधात आपलीच लोकं कोर्टात जातात अशी खंत त्यांनी व्यक्त केली. गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला उत्सव आहे तो दाऊदचा उत्सव नाही की त्याला विरोध करायला हवा असा चिमटाही त्यांनी काढला. त्याचबरोबर, गणेश मंडळांवर आरोप करण्याआधी त्यांचं सामाजिक काम पाहाण्याचा सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिला आहे. गणेश उत्सव दणक्यातच झाला पाहिजे आणि त्यासाठी शिवसेना मंडळांच्या पाठीशी असल्याचं उद्धव यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईत एका दिवसात 300 मिलीमीटर पाऊस पडला तर मुंबई तुंबणार नाही का? असा अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंनी भाजपला सवाल केला आहे. शिवाय दिल्लीच्या पूराचा दाखल देत मुंबईच्या तुंबईची पाठराखणही केली आहे.-- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Post a Comment